प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.12) दूरदृश्यप्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई सेंट्रल स्थानकातून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातील एकूण 506 प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये 150 ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, 130 सौर पॅनेल, 18 नवीन रेल्वेमार्ग/ रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रुपांतरण, 12 गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, पाच जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन, चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन आदींचा समावेश आहे.

देशातील सर्वसामान्यांचा नवनवीन योजनांच्या माध्यमातून सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून, रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सन 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जीवन वाहिनी ठरलेल्या रेल्वेच्या देशभर पसरलेल्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक बदल होत आहे. देशात दररोज 15 किमीचे नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहेत. रेल्वे गाडी प्रमाणेच देशाच्या विकासाची गाडी वेगाने धावत आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना आणि एकता मॉलच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळत आहे. लातूर येथील कारखान्यात तयार होत असलेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनची राज्यातील संख्या सात वर पोहोचली असून राज्याच्या विकासात केंद्र सरकारचे मोठे सहाय्य मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button